Sufi: वूमनहूड
वूमनहूड लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
वूमनहूड लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा


'आई...'
आजपर्यंत जे लिहायला माझं मन तयारच होत नाही, हा एवढा एकच विषय असेल. कारण लिहायला जावं तिथे डोकं काहीच बोलत नाही.

नेहमीचे असंख्य विचार असणारं मन अशावेळी काय आठवून देतं माहिते?
"तिचा हिरव्या चुड्याने भरलेला दणकट हात, जो कधीही पडायचा उशीर असायचा... "
दणकट होती ती, आजही तितकीच स्थिर आणि त्याहून जास्त खमकी!
आज मला मुक्तपणा कळतोय, बंधने, गुलामी, अहं पणा कळतोय, स्वार्थी लोकांतील राजकारण कळतंय हे सगळं तिच्यातून मला आलेलं देणं आहे. कारण जेव्हा एक आई विचारांनी आणि कृतींनी दणकट असते तेव्हा तिच्यातील मातृत्वाबरोबर तिच्या विचारांचा अंशही आपल्यात वावरत असतो. पण तरीही सगळं कळून आपण या वरच्या गुणांचा भाग कधी व्हायचं नाही, हेही तिचंच देणं आहे.
एक शुद्ध आत्मा कसा जन्माला घालायचां आणि त्याची निर्मिती करून त्याला शिल्पकार जसा घडवतो तशी छाननी करीत घडवायचं हे एवढं विशाल व्याप्त काम ती मन लाऊन अगदी सहज, अलवार करून जाते.
आई हे वेगळं रसायन असतं, ज्यात खूप असतं. ती म्हणजे एक मोठीच्या मोठी बुदली आहे, ती कुठल्याच कलेतून व्यक्त करताना कमी पडत नाही, ती कधीच संपत नाही, ती वाढत जाते आणि निव्वळ वाढतच जाते.
आईसाठीचं काही आठवत असेल तर, 'माझ्याही नकळत तिला माझ्यातल्या लिखाणाची चाहूल माझ्या आजूबाजूच्या लोकांनी दिली होती आणि माझ्याही आधी तिला ती कळली होती.'
परीक्षेचे दिवस होते. माझं शिक्षण महानगरपालकेच्या शाळेतलं. तेव्हा त्या शाळेच्या आपुलकीबद्दल अन् गोंडस दिवसांबद्दल कधीतरी लिहिल, पण या शाळेतील एक महत्त्वाचा दिवस होता तो.
आमच्या वार्षिक परीक्षेचे दिवस होते ते. आणि परीक्षेला मराठीच्या पेपरात "माझा पहिला नंबर आला तर...? " हा निबंध आला होता. तेव्हा मी चौथीत असेल.
मोबाईल फोन गॅझेटच्या महागड्या सावलीलाही नव्हतो आम्ही. त्यामुळे घरच्यांनी लहानपणी लहान राहणं जमवून आणि जपून ठेवलं होतं. एवढं काहीच कळायचं नाही पण 'आई जवळची आहे, ती कळायची.'
'तिचं' कसं असायचं, दिवस तिथूनच सुरू व्हायचा अन् मधल्या दुपारच्या वेळेत जे लहानपणीच सुख असतं ते अनुभवायचं अन् रात्र पुन्हा तिच्याच जवळ संपायची. गणित आयुष्याचं इतकं सहज सोप्प होतं.
त्यामुळे आयुष्याच्या दुनियादारीपासून आईने खूप जपलं.
"आई घरकाम करायची, आम्ही नातेवाईकांकडे शिक्षण घ्यायचो आणि परिस्थिती ही आपल्या फेवरमध्ये नाहीये." या तीन वस्तुस्थिती माझ्या मनावर प्रोपोगांडा राबवावा तशा मनावर बिंबत होत्या. पण एका बाजूला याच वस्तुस्थिती मला मोठं करू लागल्या. तेव्हाही मला माहीत नव्हतं, हे लेखक बिखक नेमकी प्रकरण काय असतं, जे आजही मला कळत नाही .
पण मी लिहिलं होतं त्या निबंधात, तो जो  दिवस होताsssssss.. तो मला त्यावेळी काहीच कळला नव्हता 😅
मी निबंधात लिहिलेल्या दोनच ओळींनी माझ्या बाई अनपेक्षितपणे माझ्याकडे पाहू लागल्या होत्या. बाईंनी तसं या पूर्वी कधी पाहिलेच नव्हते म्हणून काहीच तर्क लागतं नव्हते. 
मॅडमने नेहमीप्रमाणे पेपर वाटायला घेतले. 
माझा नंबर आला. पण मला पेपरच दिला नाही, तो बाजूला ठेवला. सगळ्यांचे पेपर वाटले. मी रडवेली होऊन मॅडमकडे पाहू लागले. कारण नापास होणं म्हणजे आईच्या मेहनतीचा अपमान होता तो.
मी त्यांच्यासमोर बोलेल इतकी बिनधास्त नव्हतेच कधी. थोड्यावेळाने बाई उठल्या. मला समोर बोलावलं. माझा पेपर हातात घेतला. आणि संपूर्ण वर्गात तो निबंध वाचून दाखवला. मला खूपच कसतरी वाटलेल. मला तरीही काही कळलं नाही, ना माझ्या वर्गातल्या मुलांना हे कळलं. म्हणजे त्यात एवढं काय होतं ? ते कौतुक होतं का? मला तेही कळलं नव्हतं. पण मी चुकीचं काहीच केलं नाही एवढं मात्र मला माहित होतं आणि बाई एवढ्यावरच थांबल्या नाहीत, त्यांनी दुसऱ्या दिवशी शाळेला येताना सोबतीला आईला घेऊन यायला सांगितलं.
आई धास्तीने आली की, नेमकं मी काय उद्योग करून ठेवलेय. कारण घरकामाला सुट्टी घेऊन येणं आम्हाला परवडणार नव्हतं. पण तरीही शिक्षणाच्या बाबतीत तिला तडजोड मान्यच नव्हती.
ती आली. मॅडमने कौतुकाने सांगितले, तुमच्या मुलीने काय लिहिलंय सांगितलं तुम्हाला? ती अजुनच घाबरून गेली. कारण तिला याची पूर्वकल्पनाच नव्हती. आई भोळेपणाने म्हणाली, नाही मला काहीच माहीत नाही, काय केलंय तिने?.
आता डोळे माझ्याकडे करून तिने डोळ्यांनीच रागाने विचारलं, पूजे अभ्यासाकडे लक्ष द्यायचे का नुसते उपद्व्याप करून ठेवतेय. ती खूप चिडून गेली होती. ती अजून चिडणारच तेव्हा मॅडम बोलल्या, " शाबासकी द्या तिला आणि या ओळी वाचा." आई साधारण शिकलेली त्यामुळे तिने वाचलं. 
मी लिहिलं होतं, "माझा पहीला नंबर आला तर, मला खूप आनंद होईल. पण मला खूप आनंद होईल कारण माझ्या आईला याचा खूप आनंद होईल. त्यामुळे खूप मोठ्ठं शिकून एक नंबर मिळवायचाय! " 
तिनेही माझ्याकडे पाहिलं आणि तिच्या डोळ्यात मला पाणी दिसलं. 
पाणी म्हणू की शाबासकी म्हणू की ते आनंदाश्रु होते.? तिच्या कष्टाचं चीज होतंय, तिच्या कष्टाचं रोपटं पुढे खूप मोठं होणारे, तिच्या डोळ्यात तो विश्वास मला जवळ घेऊन कौतुकाची थाप दिल्यावर मला दिसला होता. नकळत्या वयात आई आपल्याला मोठ्ठी स्वप्न दाखवू लागते.
"गरिबीतून मोठ्ठं होण्याचं स्वप्न तिने त्या दिवशी मला दिलं होतं. "
परिस्थिती हे अपयशाचं कारण कधीच नसते. तुला ते करायचं आहे तेव्हा तुला कोणीच थांबवू शकणार नाही. ते आजही तिने मला कधीच थांबवलं नाही.
आईच्या डोळ्यात जेव्हा आपल्या कलेविषयी आदर आणि स्वप्न दिसतात, तो दिवस आपल्या आयुष्याचा सोहळा असतो. सुदैवाने हे लिखाणातील कौतुकाचे सोहळे मी तिच्या आनंदाश्रुच्या सौख्यात दोनदा अनुभवले. त्याला कसलीच बरोबरी नसते. ते सुख असतं, कुठल्याच किंतुशिवाय मिळालेलं एकमेव सुख!
त्यामुळे स्वतःच्या स्वप्नांना आईच्या शाबासकीचे तोरण लागले की स्वप्न पूर्ण वाटू लागतात आणि आयुष्य स्वर्ग वाटू लागतो. वास्तवाचे चटके सहन होणार नाही इतके असतील पण त्यातही सौख्याचा सागर तिच्या हाताच्या स्पर्शात असतो. 
वास्तव स्वीकारलं नाही तरीही ते असणारच आहे पण, त्या वास्तवातील कविता होणे तुम्हाला जमायला हवे! हे शिकवून अन् घडवून जाते ती ! 
अशा माऊलीला "मौल्यवान मातृदिनाच्या मातृमय शुभेच्छा !"

वास्तवातली कविता !

by on मे १२, २०१९
'आई...' आजपर्यंत जे लिहायला माझं मन तयारच होत नाही, हा एवढा एकच विषय असेल. कारण लिहायला जावं तिथे डोकं काहीच बोलत नाही. नेहमी...
मादक आहेस, मोहक आहेस, सेक्शुअल ऑब्जेक्ट आहेस...
तू सुंदर आहे, तू रेखीव आहे, कोरीवही आहे... दुय्यम.
पूर्ण आहेस, स्पष्ट आहेस, आत्मविश्वासू आहे हे प्रथम!

सौंदर्यापलीकडे 'जे छान आहे ते तुझं करून घे !' 
तू अडकत जाते तुझ्या परिस्थितींमध्ये.
भीतीला तू जरा नाकारायला शिक !
जुन्या रस्त्यांचा पाया ठेव, पण वाट त्याला तुझी जोड!
तडजोड ही वाईट गोष्टींबाबत ठेऊ नकोसच बजावतेय समज.!
कारण 'छान'ची जागा जेव्हा तडजोड घेईल, सवय तुला होत जाईल.
त्यामुळे तू घसरत जाशील या गाळात.
त्यामुळे ठामपणे स्वच्छ प्रवाहाचा तू भाग बन !

छोटी रहा, सीमित रहा, मर्यादित रहा,
पण स्वयंप्रकाशित स्वच्छ रहा !

ताकद तुझ्या पायांत आहे, पैंजणात आहे, डोळ्यात भरल्या त्या घट्ट काळजात आहे,

एक कटाक्ष टाकण्याचा उशीर आहे.
गळ्यात सेक्शुअल ऑब्जेक्ट झाकणाऱ्या तुझ्या ओढणीत आहे,
ती समोरच्याच्या गळ्यात अडकण्याचा उशीर आहे.
तशी ती मनगटाच्या जोडीला तुझ्या बांगड्यांत आहे,
ते मनगट एखाद्याच्या मानगुटीवर आवळण्याचा उशीर आहे.!
हो ती वेणीला माळणाऱ्या गजर्याच्या दोऱ्यातही आहे,
त्या दोऱ्याने त्याच्या नरडीच्या तिथे कुस्करून मागे खेचायचा उशीर आहे!
तीच ताकद कानातल्या डुल्याच्या टोकदार दावणीत आहे,
त्या तारीने ओरडबडायचा किंवा त्याच्या उघड्या भागाला,
नाहीतर सरळ त्याच्या लिंगाला ओरडबडायचा उशीर आहे ...
त्यासाठी स्वतःची ताकद ओळख.!

सौंदर्यात मढवून ताकद तुझी बांधून ठेवली म्हणे...
आता या सगळ्या सौंदर्याच्या तारांनीच तू सजही नि त्याचा वापरही कर!
वापर कर चांगल्यासाठी, तुझं वाईट होताना ते चांगलं करण्यासाठी !
या सगळ्याची ताकद तुझ्या कणाकणात आहे.

तू स्वतःला सतत सांगत रहा, तुला नेमकं हवं काय आहे.
जाण याची तू स्वतःला करून दे !
तुझ्या कम्फर्टझोन मधून बाहेर पड, आव्हानं आहे पण वैयक्तिक आहेस या लढाईत याचा आनंद तुला असेल.
जन्म घेताना झगडून, नंतरही कसनुसं जगून मरायचं असेल तर, जगू नकोस स्पष्ट आहे. 
या पायांना हे असं जखडून ठेवण्यापेक्षा, पूर्वापारच्या बेड्यांना तू जिद्दीने तोडून टाक,
नि हे जखडलेले परंपरेच्या रक्तात माखलेल्या पायांतच ताकद आण, हवं तसं आयुष्य जगण्यासाठी !
रक्तबंबाळ तावदानांतून तू तुझ्या स्वप्नांना त्यांचं आकाश दे, आणि मुक्त हो ! 
स्वतःसाठी निदान... ?




कम्फर्टझोनमधून बाहेर पड...!

by on मार्च ०७, २०१९
मादक आहेस, मोहक आहेस, सेक्शुअल ऑब्जेक्ट आहेस... तू सुंदर आहे, तू रेखीव आहे, कोरीवही आहे... दुय्यम. पूर्ण आहेस, स्पष्ट आहेस, आत्मविश्व...


"तुमच्या अंगातली ती नस काढून टाका बरं, जी तुम्हाला बाई म्हणून काही आव्हान पेलू देत नाही..."
साला हा प्रॉब्लेम तोपर्यंत जाणवत नाही जोपर्यंत एखाद्या रविवार तुम्ही १४ वर्षाच्या प्रदीर्घ काळानंतर क्रिकेटच्या मैदानावर जात नाही ... किंवा मग देवकुंडच्या धबधब्यावर जातात, जिथे तिथला तो धबधबा असा अंगावर येत असतो पण तुमची आणि तुमच्या अंगावर मनाची वाढ फक्त होत असते कारण त्या अंगावर 'भीती' नावाची कातडी जाडसर थरात चिकटलेली असते ... त्यामुळे त्या एवढ्या प्रकर्षाने अंगावर येणाऱ्या पाण्याला तुम्ही विरोध करत दुरूनच मुलं कशी त्या पाण्यात पोहतात, याचा समजूतदार आनंद लुटतात.... 
आणि दुरूनच त्या जाडसर भीतीच्या थराला समाजाने दिलेलं 'नाजूका' नाव तुम्ही जगू लागतात आणि गर्वाने वाढत राहतात नाजूका म्हणूनच!... आणि असं  मिरवण्यातच समाधान मानणाऱ्या अनेक मुलीच मी पाहिल्याय आजही, दुर्दैवाने.!  
ए मुली, 
नाजूक होणं हा तुझ्यातला सुप्त गुण आहे, त्यात नजाकत अदा आहे. पण  तू त्या गुणाला इतकं तुझ्या शरीरातल्या प्रत्येक अवयवांमध्ये म्हणजे लिटरली हातापासून पायापासून कोपर्‍यापर्यंत, रुजवून भिनवून अंगा खांद्यावर खेळत  ठेवलंय की एक झुरळ दिसलं तरी तू पलंगावरून खाली उड्या मारत राहते, किंचाळते कितीतरी वेळ... मग मला सांग तोच आवाज तू तुझ्या स्वतःच्या हट्टासाठी का बरं नसेल वापरत?
मगग्ग माझा संताप सुरू होतो... मला प्रश्न पडतो याच मूळ नेमकं आहे कुठे? 

'माझ्या भोवतालच्या परिसराने मला मुलगी म्हणून वाढवलं.' या जगातल्या एकमेव कारणामुळे किती गोष्टींना मी मुकले माहिते... ?  
लहानपणी माझं मैदान सुटलं. 
घरच्यांनी हुशारीने माझ्या हातात बॅटऐवजी लाटणं दिलं. आवाज उठवणं मला माहित नव्हतं. अजाणत्या वयात मला जसा आकार दिला मी बनत गेले, घडत गेले. मग आता का निम्म्याहून अधिक पुरुष यावरच अडतात कि बायको मॅच पाहू देत नाही किंवा तिला पाहणं आवडतच नाही.
अरे, जर तुम्ही तिच्या जन्मानंतर धाडकन २५व्या वर्षी मॅच बघायला बसवाल तर तिला घंटा त्यातला फॉर सिक्स सोडून काही कळणारे.? त्यातही ती बसलीच तरी त्या संपूर्ण मॅचमध्ये फोर सिक्स मारले किती जातात कि ती त्याचा आनंद घेऊन तुमच्या सारखं म्हणेल, "अरे यार्र्र्र याने हा बॉल फास्ट टाकण्यापेक्षा स्पिन टाकला असता यार्र्र्र ..... शिट्ट सुटलाssss..." आणि तिथेच ती म्हणते मला क्रिकेट आवडत नाही जसं काहीअंशी पुरुष  म्हणतात आम्हाला टेलिव्हिजनच्या डेली सोप्स, मालिका आवडत नाहीत.  क्रिकेट सर्वमान्य म्हणून त्याचा गर्व, पण याउलट डेली सोप्स ही तिची आवड, ती कितीही टिपिकल असो, तिची आवड असूनही त्यावर जोक्स,  स्टिरिओटिपिकल !
आज मैदानात उतरले मी....
आवड म्हणून सगळा जीव एकवटून किमान 'त्या बॉलरचा बॉल बॅटवरच येईल' हे ध्येय ठेवलं. मग तिथे तर फोरसिक्स बात दूरच होती... मी क्रिकेट खेळतेय, हाच संपूर्ण आनंद माझ्यात होता...
मी सगळीकडे एक नजर टाकली, त्या एवढ्या मोठ्या मैदानात फील होता हा माझ्या खेळण्याचा पण निसर्ग सोडला तर या २१व्या शतकातही 'अरे मुलगी क्रिकेट खेळतेय' म्हणून खिळलेल्या नजरा सुटल्या नव्हत्या.
तितक्यात माझं ध्येय धरून, एक  बॉल बसला ना बॅटवर आणि मी होत्या नव्हत्या ताकदीने फिरवली बॅट आणि अंदाधुंदी माझा फोर गेला, बाबोsssss  माझे मित्र कित्ती खुश झाले माहिते... मी इतक्या इतक्या जोरजोरात ओरडले आमची टीम आनंद सेलिब्रेट करू लागली...
त्यांच्या त्या आनंदात मी माझं लहानपण आता फुलण्याचा आनंद पाहिला, मारलेला तो आनंद त्यांनी त्यांच्या मला चियर करण्यात शोधून दिला, तो आनंद इतका जास्त म्हणजे कसं माहिते का... तुमचं शरीरच नाही तर तुमचं मनही तिथे खेळले असतं... 
नकळत विचार थांबलेले असतात. 
नीट निरीक्षण केलं तर लक्षात येतं, मुलींना वाटून दिलेल्या कामांत उदाहरणार्थ चपात्या करणं असो, कपडे धुणं असो प्रत्येक कामात डोकं मन यांचं युद्ध चालूच असतं...
जेव्हा हे मन, डोकं आणि शरीर एकत्र येऊन खुश होतात तेव्हा खरा आनंद, खरं स्वातंत्र्य असतं. ते माझ्या मते, क्रिकेटमध्ये होतं... आणि मी मनस्वी मुकले या गोष्टीला. माझ्या स्वातंत्र्याला.  
याशिवाय सुटल्या त्या खूप गोष्टी... 
माझा कुणाला विरोध करणं सुटलं. माझं मिरवणुकीत ' गणपती बाप्पाsssss' कुणाच्या आधी म्हणणं सुटलं,  मला निसर्ग एकट्याने अनुभवणं सुटल. माझं रात्रीत एकटं बाहेर फिरणं सुटलं. एखाद्याने 'अरे' केलं तर त्याच्या डोळ्यात डोळे खुपसून तिथेच त्याच्याशी निपटनं सुटलं. गेयरची गाडी हातात घ्यायची नाही , घेतली आणि आक्सिडेंट झाला तर....? बाबोsss , त्या चेहऱ्यावर धपटली तर लग्न कोण करेल तुझ्याशी ? त्यामुळे गपगुमान स्कुटी घ्यायची ते नसेल जमत तर दादा येईल सोडवायला कॉलेजच्या गेटपर्यंत, घ्यायलाही येईल. 
जेणेकरून मुलगी म्हणून तुम्ही दुसऱ्या मुलाकडे डोळे वर करून पाहण्याचे धाडसही करायचे नाही. प्रेम मुलीच्या आयुष्यात नसतं तिने सगळं अरेंज जगावं,  आयुष्यही आणि लग्नही... 
पण हे सुटलं कि सोडवलं... ?
तुम्हाला माहिते जसं एखाद्या व्यक्तीच्या व्यसनाने त्रास होतो, तेव्हा ते सुटलं जात नाही सोडवलं जातं, तेही त्याच्या आप्तस्वकीयांकडून. 
माझं (स्त्रीचं)'लहानपण' ही माझी नशा होती, ती नशा समाजाच्या दृष्टीने, सासरी गेल्यावर माहेरच्या सो कोल्ड 'संस्कारांचा' नाश करणारी होती, त्यामुळे ही नशा आयुष्यात भिनण्याआधी ती सोडणं गरजेचं होतं...   
ही नशा कशी सोडवली माहिते... 
"बाळा, शेवटची चपाती तुला करायला देईल हां ... बघ ही अशी जाळायची नाही गं... कपड्यांना इतकी साबण मी लावते का पुढच्या वेळी हा छोटा कपडा धुवून बघ बर्र्र..." ही अशी गोडीगोडीने समाजवलेली कामं लहानपणीच्या त्या जोशाजोषात मुलीला कुठे माहित असतं कि, आपण आपल्याच हाताने एका बंधिस्त आयुष्याला आवताण देत आहोत. 
काम शिकण्यामध्ये माझा कधीच आक्षेप नाही. पण कामांच्या मागचा उद्देश "लोकाच्या घरी जायचं तुला, तिथले लोक काय म्हणतील हेच शिकवलं का आईने.... ?" यावर आहे. 
हे एक वाक्य सासरकडून ऐकायला मिळू नाही म्हणून मुलीचे पालक स्वतःच्या मुलीच्या आयुष्याला ही पाय आखडून ठेवण्याची तोरणं लावतात, आणि आनंदाने एक आयुष्य सरकवतात मुलगी आहेस तू या नावे...  
त्यावेळी झुरळांना पाहून घाबरणाऱ्या त्या मुलींना बोलावंसं वाटतं,
धडधाकट स्त्रिया तुम्ही,  ह्या अशा बसच्या सीटवर जागा मिळाली नाही किंवा 'नळावरची भांडण' म्हणून प्रसिद्ध होतात, भांडतात... जरा हेच भांडण स्वतःच्या स्वातंत्र्यासाठी, स्वप्नांसाठी करायला शिका ना आतातरी. 
"शिवाजी जन्मावा तो शेजारी तसं, रणरागिणीसारखं आयुष्य जगावं ते शेजारच्या मुलीने, आम्ही बघ्याचं काम करू." असं करणाऱ्या स्त्रियाच आज अधिक वाढत आहेत, हे बदलायला हवं... असं नाही वाटत?
मला आता पडणारे प्रश्न हे आताच्या काळासाठी फेमिनिज्म (नारीवादी) या विषयावर खपणारे असतील, पण ही प्रश्नपत्रिका प्रत्येक मुलीने एकदा स्वतःच्या मनापुढे ठेवावीच, त्याशिवाय हा जन्म एक चालढकल आणि दुसर्याने तुमच्यावर केलेले उपकार असतील. 
तुझा जन्म हा कुणाच्या तरी जन्माच ओझं बनूनच राहील ... 
भांडणारे भांडत राहतात स्त्रीत्व, फेमिनिज्म आणि समलैंगिकत्वासाठी... आणि या भांडणामुळे एखाद्या स्त्रीच्या वाट्याला हा फेमिनिज्म जपणारा नवरा येतोही तेव्हा ही बाई त्यातच धन्यता मानून भावी आयुष्यात तितक्याच मर्यादेत चिवट स्वप्न पाहू लागते... आणि मुख्य म्हणजे ती ही चिवट स्वप्नही कुणाच्या तरी जिवावर पाहते... 
सिम्पथी किंवा दयेच्या कुबड्या घेऊन हे आयुष्य चालवते... तिची सावित्री होत नाही. 
सावित्रीबाईने नवऱ्याकडून मिळालेली शिक्षणाची देण स्वतःपुरतीच ठेवून धन्यता मानली नाही. तिने तिला मिळालेल्या स्वातंत्र्याची उब अशा अनेकींना मिळावी म्हणून धडपडली. 
इथे प्रॉब्लेमच हा आहे, नवरा मनासारखा मिळाला कि काहीअंशी स्त्रिया स्वप्नांनाच पूर्णविराम देतात. 
शेवटचं सांगू, जन्माला घाला ना तो जन्म जो खरंच तुम्हाला जगावासा वाटतोय, त्यासाठी धडपड करा, स्वतःच्या आयुष्याचं देणं पूर्ण होईल. 
दै. प्रभात वृत्तपत्रात छापून आलेला वरील लेख 


कुटंबातल्या नात्यांत...
धागे गुंततात, उलगडायला वेळ लागतो.
एकत्र जोडुन धरायला वेळ लागतो की, मग उलगडणं महत्वाचं वाटत नाही ?
असमान आसमंत अटळ होत जातो. निर्मितीकक्षा चिवट होतात आणि 'पुन्हा सगळ्यांनी एकत्र यावं' हा आविर्भावही कुणाच्या मनावर बिंबत नाही ...माणुस समुद्र नाही होऊ शकत, तो तितका विशाल नाही बनू शकत. त्याच्यात कुणाला आपलंस करण्याच सामर्थ्य नसतं...तो निस्वार्थ होणं म्हणजे ... असो ! 
सुरेश आज खूप दिवसांनी घरी आला. मी खुश होते. अम्मू पण खुश झाली. जाईच्या चेहर्यावर मात्र कडवट भेग विस्फारली. मन्याला काही कळणं तर अशक्य होतं. शेवटी प्रश्न होता सुरेशचा ...
नात्यांतल्या गैरसमजाचा, वादाचा हा खेळ खुऊप कडवट असतो. समजण्या आणि समजावण्यापलीकडचा ...
सुरेश आयुष्य जगला होता. 'रुबाबतील ढब' एक व्यक्तिमत्व होतं त्याचं. समोरचा बेधडक गार होऊन त्याचं ऐकायचा, असा तो होता. घरातल्या किंवा बाहेरच्या कुठल्याच नात्याला मानायचा न जपायचा तो. त्याचं व्यक्तिमत्व म्हणजे सुस्पष्ट ढोंगीपणा होता. जेही होतं जगासाठी, जगाच्या दृष्टीने.. 
दूर कशाला जायचं, कालचंच उदाहरण सांगते.
शलाखाने (मैत्रीण) फेसबुकला स्टेटस टाकलं होतं,
"रिश्तोंसे खूबसूरत कोई दौलत नहीं होती, दौलत होकें भी रिश्ते ना हो तो आपकी खुशिया भी दुबली हो जाती है | "
त्यावर त्याने कॉमेंट केली:
"बहोत खूब शलाखा... आजकाल की जनरेशन कहाँ ईतना सोचती है ...."
सुरेश इथेच सिद्ध झाला.! 

पण.............
हो 'पण' आहेच.
स्वभावबद्ध प्रतिमा कधीकधी बदलतात. इतक्या की सुखद अपेक्षाभंग होतो आणि आवाक भाव जखडून मन जोखिमीने प्रश्न करून उठतात.
सुरेशने आज 'मला' घरी आणलं होतं. यावेळी घरी येताना त्याने स्वतःच्या पलिकडे बघण्याचे कष्ट घेतले होते. 
मन्याला बोटांनी अक्षरओळखीची पाटी आणि अम्मूसाठी साडी आणली होती .... सुरेशचं हे बदलणं अनपेक्षित होतं.! 
यासगळ्यात जाई मात्र कडाडून तापलेली होती. तिच्या रेखीव डोळ्यांत तो अंगार झळकला. अम्मूने हातानेच शांत केलं तिला. प्रेमळ सासू असली तरी सुरेशची ती आई होती. त्यामुळे स्वाभाविक तिचा कल सुरेशकडे जास्त होता.
भेगाळलेला राग तिचा एखाद्या नसेतून बाहेर येणार होताच, तोच रेडिओ 'सदाबहार'ला अलका याग्निकचं 'क्या तुम्हे याद हैं।' लागलं...
आणि...
आणि चक्क सुरेशने जाईचा हात हातात घेतला. तिला एका जेंटलमनसारखं 'वूड यू लाईक टू डॅन्स विद मि ?' विचारलं. अडखळत, गोंधळत जाईची पुरती धांदल होत, विचारांची फरफट होत ... हो? नाही? च्या वावरातच ती नकळत त्याच्याबरोबर संलग्न झाली होती.
घरात आम्ही सगळे होतो, अगदी आधीचेच सगळे ... पण त्याने घेतलेल्या या अनपेक्षित स्वभाव वळणाने आम्हीही चाटच पडलो...
घरात ही अशी कित्येक दिवसानंतर क्षणाक्षणावर, घरातल्या भिंतीभिंतींवर ख़ुशी बहरत होती. भेगाळलेल्या भिंतींत ती बसली होती. 
आता पुढे कित्येक वर्षे या दृष्ट लागल्या घरी पुन्हा कुणी रुसणार नव्हतं, रागावणार नव्हतं, अबोला धरणार नव्हतं....  
जाई खुश होती. कारण जाईसाठी भेट म्हणून खुद्द सुरेशच आला होता. तिला आता काहीच नको होत ... अम्मूची तर काळजी तेव्हाच मिटली,जेव्हा सुरेशने आईसाठी साडी घ्यावी, या विचाराने साडी आणली. अक्षरओळखीची पाटी आणून न सांगता त्याने मन्याची जबाबदारीही घेतली. 
आणि मी ?
माझं काय ?
मी तीच होते जी त्या रात्री सुरेशच्या आयुष्यात आले ....
"खुशी/आनंद/सुख"

त्यामुळे माणूस जेव्हा जेव्हा 'स्व' पलीकडे जाऊन बघतो तेव्हा त्याच्या आनंदाच्या कक्षा दुपटीने  विस्तारतात...  आणि म्हणून कित्येक कडवट रात्रीनंतर सुरेशच्या एका पुढाकाराने  ती रात्र 'माझी' ठरली .....


(वरती वापरलेले "मी, माझी, मला" हे शब्द "आनंद, ख़ुशी, सुख: या अर्थाने वापरले आहे. )

ती रात्र 'माझी' ठरली .....

by on जुलै ११, २०१८
कुटंबातल्या नात्यांत... धागे गुंततात, उलगडायला वेळ लागतो. एकत्र जोडुन धरायला वेळ लागतो की, मग उलगडणं महत्वाचं वाटत नाही ? असमान आसमंत अ...

"वडील (?)
कोण आहे हा व्यक्ती ?
शब्द नवा नाहीये पण माझ्यासाठी कोण आहे ... ?
त्याची माझ्या आयुष्यातली भूमिका काय आहे..?"
सगळं केवढं वेगळं आहे हे ....
मला या शब्दाचा त्रास होतोय हो ...!   ज़रा शांत बसाल तुम्ही? 
नका विचारू मला असले पाया नसलेले प्रश्न .... 
इतके दिवस त्रास नव्हता होत. मी बोथट झाले होते, पण आज अचानक शरीरातून सळसळती वीज जावी, दुखत्या भागावर घणाघाती आघात व्हावा तसं अंग आतून युद्ध करून उठलं, जेव्हा ऑडिटमधे मला 'वडिलांवर' बोलण्यास संगितले...
काय वेगळं आयुष्य आहे ना हे ...? म्हणजे​ नटसम्राटमध्ये म्हटलं तसं लुळ्यालाच चप्पल नसल्याच दुःख सांगावं, तसं आज एवढा सगळा स्टाफ सोडून वडिलांवर फ़क्त मीच बोलावं हे माझ्या वाटणीला यावं......? 
त्यावेळी हळवी वगैरे मुळीच झाले नाही मी ...एखादी जखम लहानपणापासून वाट्याला आली कि तिचं दुःख  तर होतंच नाही पण ती तिथे आहे कि नाही हेही  आयुष्याच्या लढाईत विसरून जातो, माझ्या आयुष्यात बापाचंही तसंच झालं एखाद्या जखमेप्रमाणे... 
पण खंबीर होऊन वाट्याला आलेला तो टास्क मी, वॉशरूममध्ये जाऊन मनात एकच विचार केला, "माझ्यासमोर असणाऱ्या या प्रत्येकाकडे आई-वडील या दोन वेगवेगळ्या व्यक्ती आहेत, पण माझ्या आयुष्यात असणारी एकच व्यक्ती केवळ माझी आईच नाही तर ती माझी वडीलही आहे आणि जी आई मुलीचे वडील होऊ शकते ती मग कुठलीही भूमिका सहज निभावू शकते ...."
पण मी त्यांना असं संगितल की माझी आईच माझे वडील आहे तर.. ?
ते कसं  वाटेल ऐकायला? विशेष म्हणजे अनेकानेक मानसिक प्रश्नार्थक नजरांना मला सामोरं जावं लागणार तेव्हा त्यांना आश्चर्य नाही वाटणार किंवा वाटेलही पण ....
पण माझ्यासाठी त्यांचं आश्चर्य गौर करण्यासारख असेल? अज्जीबात नाही कारण त्यापेक्षा माझ्या या 'विश्वानं' हे सगळ आतापर्यंत निभावून आणणं, एक आई आणि एक बाई म्हणून ते कोण्या वीरपुरुषाहून कमी धैऱ्याचं नाही ठरणार! मी ते सांगण्यातच धन्यता मानेल... 
"त्रास होतो आता.?" बॅकग्राऊंडमधून प्रश्न येईल. 
"नाही रे ! त्रास नाही होतंय आता, सवय झाली नां... फक्त लहानपणी वडील शोधला, नाही मिळाला कुठेच. मग खोट्या आशांवर जगत राहीले. आयुष्य मोठं होत गेलं. मग आजूबाजूचे प्रश्न करायला लागले. त्यांच्या प्रश्नांनी मला कोड्यात पडायला व्हायचं.
मागे एकदा आईला विचारलंही, "आई, बाबा कुठे असतात गं ? ..... ती शांत राहिली आणि मी तिची शांतता समजण्याइतकी मोठी झालेली.  त्यामुळे मी तोच प्रश्न पुन्हा उच्चारला नाही. आयुष्यात कद्धीच!
बाबा होते ना... त्या दिवशी खरंतर त्यांना मिठीत घ्यायचं होत, थोडं सांगायचही होतं माझ्या भविष्याबद्दल, माझ्या जोडीदाराबद्दलही. पण त्यांना शेजारच्यांच लग्न पार पाडायच होतं, शिवाय जोशींची मुंजही होतीच .....
मला कळतच नाहीये प्रत्येक मुलीच्या आयुष्यातला हक्काचा हीरो, माझ्या आयुष्यात साइडरोल का करून गेला...! 
असो ! 
म्हणूनच डोळ्यातला अभिमानाचा समुद्र तिच्या पायाशी ठेऊन म्हणते, " बापाचं जाऊदे ,पण आई भरभरून दिली, इतकी की बाप होऊनही ती पुरून उरली ........"
"हॅपी फादर्सडे आई ...."
तुझीच लाडली. 
(वेगळ्या दृष्टीकोनातून पाहायला मिळालेले वडील)



बापआई तू...

by on जून १७, २०१८
"वडील (?) कोण आहे हा व्यक्ती ? शब्द नवा नाहीये पण माझ्यासाठी कोण आहे ... ? त्याची माझ्या आयुष्यातली भूमिका काय आहे..?"...
आरशात पाहून पुढाकार घेतला तीने.
त्या आरशातल्या डोळ्यांत डोळे घालून ती स्वतःला शोधू लागली...
नजर रोखून तिने पुन्हा बघितलं.
कूछ बरस पेहले झालेले डार्कसर्कल तीला खोचत होते. जटा झालेल्या केसांच्या भुरभुरीत धुरा झाकत होत्या त्या काळ्या धब्यांना.चेहऱ्याच्या पुष्टीला तर कुठलं वळणच राहिलं नव्हतं. तिने डोळे विस्फारले, गाल फुगवले आणि ओठांच्या रेषा शक्य तितक्या ताणवल्या, ती स्फोटक दिसत होती.
काही वर्षांपुर्वी आरशात तीला 'तो'ही दिसायचा सोबत. आता ती स्वतःच क्वचित दिसते. तीने प्रेम केलं, तिच्यापेक्षा वयाने १५ वर्षे मोठ्या असलेल्या प्रौढाशी.... हो प्रौढच मनाने आणि विचारानेही.
'स्वतःच अस्तित्व शोधून देणारा कुणी मिळाला, कि कोणताही व्यक्ती फसतोच, तीही फसली.'
नाही....ती फसली नव्हती.
'त्याने फसवलं होतं. तीने प्रेम केल होतं.'
तिला स्वतःचे विचार उरले नव्हते. किंबहुना तिला विचारच उरले नव्हते. ती चपटी झाली होती चहूबाजूंनी. त्याने शोधून दिलेलं अस्तित्व त्याच्याबरोबरच नाहीस झालं होतं.
तो गेला .....
तो गेला म्हणजे त्याने दुसरं लग्न केलं किंवा मग आधीच लग्न झालं होतं किंवा मग त्याने हिला लुबाडून खोटी ओळख दाखवून पलायन केलं, यातलं काहीच घडलं नाही.
तो गेला,कारण तिने त्याला मारलं....
हो ..
हे खरयं!
प्रेमापोटी,प्रेमासाठी आणि प्रेमामुळे.
हात चळचळला होता का तिचा ? हा प्रश्न मलाही पडला, पण एका टोकाला जाऊन संयम सुटला नि तिने मारलं.
घटका दीडघटका विचारांच्या वावटळीत ती अशीच आरशात ऊभी होती, पण अचानक लगातार दरवाज्यावर पडणार्या थापेवर तिचं लक्ष गेलं...आता तिने घाई करुन,केस बांधुन, तोंडावर पाणी मारुन,तोंड पुसतपुसतच दार उघडलं....
समोर 'तो' होता.
हो 'तो' निशंक जिवंत होता.
तिने मारलं तिच्या कल्पनाशक्तितल्या 'त्याला'.
आपल्या अस्तित्वाला कुणी स्पर्श केला कि तडक क्षणालाही न जोपासता, डीलिट करावं त्या व्यक्तीला. तिनेही तेच केलं.
तितकं सोपं नसतं ते. पण अवघडही नाही. 'फक्त कधीतरी स्वतःला आरशात बघावं त्यासाठी.'
स्वत:चच अस्तित्व नसेल,तिथे त्याला ठेऊन काय करणार होती ती ? म्हणून मारलं.
हात चळचळला तिचा,पण आता अस्खलित जिवंतपणा आला त्या हातांमधे.
आता तो आला होता पण तिचा त्याच्याशी कुठलाही संबंध नव्हता कारण यावेळी स्वतःच अस्तित्व तिला जपायचं होतं, त्याच्या अस्तित्वापेक्षा..
त्याला पाणी विचारून माठातून पाणी घेत घेतच चक्क एका वर्षानंतर ती गुणगुणली तेही गौर कारण्यासारखंच,
"खुद से आँख मिला पाओगी, खुद से मोहब्बत कर पाओगी, 
कई भूले नगमे मजबूत करेंगे तुझे, 
आइना ग़ौर से तू देख ले| "

आरशा....!!!

by on जानेवारी ०७, २०१८
आरशात पाहून पुढाकार घेतला तीने. त्या आरशातल्या डोळ्यांत डोळे घालून ती स्वतःला शोधू लागली... नजर रोखून तिने पुन्हा बघितलं. कूछ बरस पेहले...
तो असा समोर बसलाय .. काय बघतोय देव जाणे ! पण मगाचपासून बिंदास्त निरीक्षण करतोय. अशी ताणताण उठेल नि त्याला विचारेल, की 'काय बघत आहात काही प्रॉब्लेम आहे का ?'
पण नाही.... कोणाला बघायला जाताना अस नाही ना बोलत ... ?
काही माणसं न सांगता बघतात. त्यांना बोलता येतं. पण लग्नासाठी सांगून बघतात, त्यांना नाही नं बोलता येत ?
तो अकरावा मुलगा होता, बघण्यासाठी आलेला. त्यामुळे घरचे आधीच खूप त्रस्त होते.
'आता मिळेल तसा मुलगा स्वीकारायचा,तू नाही बोलायचच नाही. त्याच्या होकाराची फक्त वाट पाहायची. ' हा सूर एव्हाना माझ्या अंगवळणी लागला होता. त्यामुळे दोन मिनटांपूर्वी 'तो असं का बघतोय' म्हणून पडलेलं सुतक वॉशरूमला जाऊन आल्यावर संपलं ..
पण पुन्हा तेच ....
केस मोकळे सोडले की तो बघतोय. मग मी हळूच लाजून, हाताने पुढे आलेली ती कुरुळी बट मागे घेते. हे थोड्यावेळासाठी तर मलाही रोमॅंटिक वाटत होतं. पण त्याची नजर माझ्या नाजूकश्या वाफेसारख्या तरळणार्या केसाच्या बटेकडे होती ? तो 'दुसरीकडेच' बघत होता. अर्थात त्याच्या अशा बघण्याने माझ्यावर होणार्‍या परिणामांच त्याला सुतक नव्हतं,तो आकंठ बुडालेला होता बघण्यात ........
मग मी हळूच लाजण्याचा बहाणा करून वॉशरूमला गेले, स्वतःला हे विचारण्यासाठी की तो खरेच योग्य आहे माझ्यासाठी ?
.
आमच्या मागे वाजणारी धून बंद झाली, त्याने समोरुन प्रश्न केला.
'चहा की कॉफी?'
विचारांच्या ओघात कॉफी मागवायची असून मी चहा मागवला...
त्या रेस्टोरेंटच्या बाहेर बिलकुल शुकशुकाट होता. सगळीकडे दमट आणि अंधुकसं वातावरण होत. मावळतीला पिवळसा रंग पसरलेला होता. थंडीच्या दिवसात रात्रीच्या वेळी चहा-कॉफी प्यायला येणारे आणि ऑफीसची घोड-दौड करून आलेले असे मोजकेच लोक होते ..
नखांची नेलपेंट काढण्यात मी मग्न होते.
'तू एरवीसुद्धा शांतच असते का?' त्याने प्रश्न केला.
यावर मी त्याला विचारू का, तुम्ही एरवीसुद्धा असेच रोखून बघता का ...?
पण त्यानीच विषय बदलला ...
बघ.....मी आधीच सगळ सांगून टाकतो,'माझी एक गर्लफ्रेन्ड आहे . आम्ही एकमेकांवर प्रेम करतो. लग्नानंतरही हे असच असेल.'
माझ्या चेहऱ्यावरचे भाव बदलत नाहीत. तो स्वतःतच गुंतुन सगळं एकसकट सांगत असतो ...
'आम्ही लग्नही करणार होतो, पण यू नो ना, जुन्या काळातले लोक. त्यांना एक सभ्य महाराष्ट्रीयन मुलगी लागते आणि त्यात तुझ्या वडलांचे आणि पपांचे खास संबंध. मग ठरलं हे सगळं. पण यात माझी चुक नाही, त्यांच्या आग्रहाखातर मी हे लग्न करणार आहे, त्यापेक्षा एक कर ना तूच नकार कळव...'
.
'आपल्याला निघायला हवं ....' मी म्हटलं.
'चल मी तुला सोडतो ...' त्याने उगाचच म्हणायचे म्हणून म्हटल.
नाही ,नको... मी जाईन.
बाय.. सी..यु सून.
.
बाय :)
.
इतका वेळ आवंढा गिळून बसलेली मी चालायला लागले. खूप रडणार होते मी. पण मला खरेच रडू येईना.
'मी रडावं का ?' किंवा 'का मी रडावं ? आणि तेही अशा व्यक्तीसाठी? ' या प्रश्नांची उत्तरं मी शोधत होते.....
मी मूर्ख होते का ? एवढ होऊनसुद्दा होकाराची अपेक्षा करत होते.
दोन दिवसांनी त्याच्याबाजुने होकार मिळाला .
लग्न ठरलं. सगळे खुश होते. घरातल्यांच्या डोक्यावरच ओझं हलकं झालं म्हणून मीही खुश होते.
'खुश होते मी ?'
.......
हो :)

घुटन...:|

by on डिसेंबर १९, २०१७
तो असा समोर बसलाय .. काय बघतोय देव जाणे ! पण मगाचपासून बिंदास्त निरीक्षण करतोय. अशी ताणताण उठेल नि त्याला विचारेल, की 'काय बघत आहात काह...

स्पर्श वेगळा, प्रेम वेगळं .
ती रात्रही वेगळीच होती.
त्याने केलेला स्पर्श अंगाला झाला मनाला नाही.
तो स्पर्श माझ्या संवेदनेला कुरवाळणारा नसून त्याची गरज भागवणारा होता....
आणि शहारा येण्याऐवजी घीण आली मला ...
मी जोरात किंचाळले,"दुर हो माझ्यापासून....
आज तुझे हात घाणेरडे आहेत, कारण आज तुझं मन नाही तुझं शरीर मला स्पर्श करतंय.
इंटिमसी नाही, आज ओढाताण आहे तुझ्या श्वासांत.
मला दुर लोट आताच्या आता नाहीतर तुझ्या श्वासांत मी गुदमरून जाईल....."
"अग्ग .. आत्ताच तु म्हणालीस ना, मला सुरक्षित वाटतंय तुझ्याबरोबर, मग ?
"सुरक्षित वाटतं म्हणजे लगेच तु तुझ्यातल्या वासनेला जागं करायचं नि माझ्या परवानगीविना जवळ खेचायचं मला ?"
तुझ्यासोबत सुरक्षित वाटतं म्हटलं खरं .... पण तो क्षण तु जपावा म्हणून.... कदाचित तु त्याचा फायदा घेतोयस (?)"
क्षणभर माझाच माझ्यावर विश्वास बसेना....ज्याच्यावर निरागस प्रेम केलं तोच .........?
पेटलेल्या या वणव्यानंतर त्याला बाहेर काढून मी घट्ट दार लावून घेतलं......
अपेक्षप्रमाणे दरवाजात रडत बसण्यापेक्षा चुकीच्या व्यक्तीसाठी घरंगळलेले अश्रू 'पुसून' टाकले. सुस्कारा सोडला नि स्वतःच्यादोन्ही हाताने स्वतःला कुशीत घेतलं, कुरवाळलं त्याच्याविना...... ❤️




तुला स्पर्श कळायला हवा...

by on ऑक्टोबर ३०, २०१७
स्पर्श वेगळा, प्रेम वेगळं . ती रात्रही वेगळीच होती. त्याने केलेला स्पर्श अंगाला झाला मनाला नाही. तो स्पर्श माझ्या संवेदनेला कुरवाळ...